शिधापत्रिकाधारकांना  प्रत्येक महिन्यात  मिळणार धान्य, नागरिकांनी गर्दी करू नये : जिल्हाधिकारी

ठाणे ,दि 3, (जिमाका):-  देशातील आपादकालिन परिस्थिती विचारात घेता सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना प्रधाममंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्रती व्यक्ती 5 किलो तांदूळ तीन महीने मोफत देण्यात येणार आहे. तसेच तीन महिन्याचा शिधा एकत्रितपणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र त्यात बदल करून आता प्रत्येक महिन्याचे अन्नधान्य त्या -त्या महिन्यातच देण्यात येणार आहे.


कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता शासनाने मजुर, शेतमजुर, शेतकरी अंत्योदय, आणि प्राधान्य गटातील नागरिकांच्या अन्नाधान्याची गरज लक्षात घेवून  त्यांना पुढील तीन महिन्याचे अन्न्धान्य आगावू देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात शिधापत्रिका धारकांना प्रती व्यक्ती 5 किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने तीन महिन्याचे धान्य एका महिन्यात देण्याचा निर्णय रद्द करून एप्रिल, मे व जून महिन्याचे धान्य त्या- त्या महिन्यात शिधा पत्रिका धारकांना देण्यात येणार आहे. तसेच हे धान्य अंत्योदय, प्राधान्य कुटुंब आणि शेतकऱयांना गहू प्रती किलो 2 रुपये व तांदूळ प्रती किलो 3 रुपये दराने देण्यात येणार आहे. 


जिल्ह्यात तीन महिन्याचा धान्यसाठा पर्याप्त प्रमाणात आहे. सर्व शिधा पत्रिका धारकांना धान्य मिळणार आहे. एप्रिल महिन्याचे धान्य वितरण सुरू झाले असून नागरिकांनी एकाच दिवशी स्वस्त धान्य दुकानात गर्दी करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.