कमजोर व्यक्ती धर्माच्या तर बलवान व्यक्ती समान नागरिकत्वावर राष्ट्रवाद निर्माण करतो - डॉ. राम पुनियानी  

भाईंदर : कमजोर व्यक्ती धर्माच्या नावावर राष्ट्रवाद निर्माण करतो तर बलवान व्यक्ती समान नागरिकत्वाच्या तत्वावर राष्ट्रवाद निर्माण करतो, असे मत जेष्ठ विचारवंत डॉ. राम पुनियानी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोशिएशन (BATA) व बहुजन समता प्रबोधिनी च्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रा. सिद्धार्थ तांबे व्याख्यानमाला कार्यक्रमात 'लोकशाही व राष्ट्रवाद' या विषयावर बोलताना व्यक्त केले. डॉ. पुनियानी यांनी सद्याच्या सत्ताधाऱ्यांवर कोणाचे नाव न घेता चांगलेच आसूड ओढले. ते पुढे म्हणाले की, खरा राष्ट्रवाद म्हणजे भारतीय नागरिकांची समस्या सोडविणे हा आहे तर जे सत्ताधारी लोक नागरिकांची समस्या सोडविण्यात अपयशी ठरतात, जे नागरिकांचा विकास करण्यास अपयशी ठरतात. असे सत्ताधारी धर्माचा आधार घेऊन हिंदू राष्ट्रवाद व मुस्लीम राष्ट्रवाद पसरवत आहेत. यांच्यापासून राष्ट्रवादाला व लोकशाहीला धोका आहे, असा इशाराही त्यांनी दिला. आजच्या समाजाला गरज आहे ती शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे, बेरोजगारी दूर करणे, शिक्षणाचा दर्जा सुधारणे, वैद्यकिय सेवा सुधारून महागाई कमी करण्याची ! परंतु आज सत्ताधारी भारतीय राष्ट्रवाद म्हणजे नागरिकांच्या समस्यांचे समाधान न करता हिंदू राष्ट्रवाद म्हणजे मनुस्मुतीच्या आधारे जुन्या रूढी परंपरेवर जातीय व्यवस्था आणण्याचे धोरण अवलंबत असून मी आज अश्या धर्माच्या नावावर राष्ट्रवाद निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात आणि भारतीय राष्ट्रवादांच्या मूल्यांचे समर्थनार्थ उभा आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. 


यावेळी रुपारेल कॉलेजच्या मराठी विभागप्रमुख प्रा. उज्वला दिलीप आवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता आणि मूकनायकचे शतक या विषयावर बोलतांना डॉ. बाबासाहेब आंबेकरांच्या निर्भिड पत्रकारितेविषयी मार्मिक माहिती दिली. 


यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नागपूर चे कवी मनोहर नाईक यांना प्रा. सिध्दार्थ तांबे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मनोहर नाईक यांनी आपल्या दर्जेदार कविता ही सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. तसेच गुणवंत सभासदांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे मिरा भाईंदर मधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना बाटा शिष्यवृत्ती वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. 


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. सुरेश गोतपगार यांनी भूषवले तर मुख्य अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे मा. उपकुलसचिव डॉ. दिनेश कांबळे, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे नगरसेवक मा. अनंत शिर्के, वसई विरार महानगर पालिकेचे नगरसेवक इंगळे, यांच्यासमवेत मंचावर बाटा चे प्रतिनिधी प्रा. डॉ. अनिल धिमधीमे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचाल न प्रा. उत्तम भगत यांनी केले तर आभार मच्छिंद्र खरात यांनी मानले. कार्यक्रमाला श्रोता वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता